श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.
लेखांक - ४
लेखांक - चवथा.
*****************
अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे.आपल्या हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वाना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनी सुद्धा अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले होते.एकदा कोनाळी गावाच्या रानातून जाताना श्री स्वामी बरोबर श्रीपादभटांसह सुमारे १०० सेवेकरी होते. त्या सर्वजणांना चालून चालून खूप भूक लागली होती. थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला व पाणी पण दिले. पण त्यांच्या बरोबर असलेले १०० सेवेकाऱ्यांच्या भोजनाचा प्रश्न सुद्धा होते तेव्हा आता काय करावे ही एक तेथे फार मोठी समस्या निर्माण झाली तेव्हा स्वामी त्या सर्वाना म्हणाले की ,
" तुम्ही सर्व जण तेथे त्या आम्रवृक्षाखाली जा." तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना वाटले की , तेथे कोणीतरी जेवण देईल. श्रीपादभटाना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती त्यामुळे काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले. तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपादभटनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली,
" आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती.पण अजून ती आली नाहीत. आता सूर्यास्त होत आला. त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा !"
तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपादभटाना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासींनीस आग्रह केला पण ती म्हणाली , " तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते." श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले. त्यानंतर तेथे सर्वांनी तो भोजन प्रसाद ग्रहण केला व सर्व तृप्त झाले. अशाप्रकारे स्वामी समार्थानीच सर्व भक्तांना अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात जेवण करण्यास दिले होते. श्रीपाद भट्ट यांचे सारखे भाग्य फारच कमी लोकांना मिळते ज्यांना अन्नपूर्णा मातेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याच भाग्य मिळालं.
अक्कलकोट येथे राहण्यास येण्याच्या पूर्वी गावाबाहेरील एका माळावर काही दिवस श्री स्वामी समर्थ महाराज रहात असत. तेथे येणाऱ्या एका गुराख्याच्या पोराला तुझ्या गावात येऊ का? असे स्वामी जेव्हा त्याला विचारले तेव्हा दोन दिवस त्याने काहीच उत्तर दिले नाही. तिसरे दिवशी तो स्वामींना या असे म्हणाला त्याप्रमाणे मग स्वामी गावात गेले.अशा प्रकारे अक्कलकोट येथे श्रीगुरूंची ओळख प्रथम त्या गुराख्याच्या मुलाशी झाली. अक्कलकोटला आल्यानंतर स्वामींनी ज्या काही लीला केल्यात त्याचेच चरित्र सध्या उपलब्ध आहे. त्यापूर्वीची स्वामी महाराजांची विशेष माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. एकदा अशाच प्रसंगी स्वामी महाराज अक्कलकोट येथे असताना त्यांचे एक आद्य भक्त चिंतोपंत टोळ यांच्या घरी असता वसंतऋतूतील एका मध्यरात्री अंगणात स्वामी विश्रांती करत लेटले होते. तेव्हा स्वामींना गाण्याची लहर लागली तेव्हा त्यांनी “गोरे रूप तुझें तुजला पाहिलें सात ताल माडीवर ॥”
ही जुनी लावणी पूर्णपणें म्हणून दाखविली.ती ऐकून पंतांना नवल वाटून ते म्हणाले, “महाराज, आपण पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते. आपली जात कोण, आईबाप कोण ते तरी आम्हाला सांगा ?” स्वामींनी त्यावेळी त्वरित उत्तर दिले की, “आमची जात चांभार आहे , माझी आई महारीण व बाप महार आहे.” असे म्हणून महाराज पोट धरधरून मोठ्याने हसू लागले.अक्कलकोटास एक म्हातारी सोनारीण वेडसर दिसे. पण तिला स्वामींची भाषा इतरांपेक्षा जास्त कळे. एकदा तिच्या समोर महाराजांस एका कलापाने प्रश्न विचारला की , “स्वामी आपण कोण आहात ?” त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले की , ‘मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर.’ हे ऐकून ती म्हातारी म्हणाली- “वटपत्र शयनी मूळ पुरुष दत्तात्रेय रूपाने अवतरले आहेत.” नंतर कोणी एक कर्वे यांनी विचारले, “ हे महाराजांचे सत्यार्थ रूपवचन आहे काय ? परंतु आपली ज्ञाती कोण?” तेव्हा समर्थ म्हणाले की , “आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आहोत , आमचे नाव नृसिंहभान आहे व मी काश्यप गोत्रात जन्म घेतला आहे. माझी रास मीन राशी आहे. आता पुन्हा जर अशा प्रकारचे मला प्रश्न विचारशील तर मी तुझं टाळक् फोडेल. काय रे, तुझी फक्कड मुलगी पुण्यास रात्रंदिवस फिरते तेव्हा तिची ज्ञानी कोण?” हे ऐकून प्रश्न विचारणारा गृहस्थ ढेकळासारखा विरघळला!
💐 निवेदन व प्रस्तुती :-
श्री वामन रुपरावजी वानरे.
No comments:
Post a Comment