नामाच्या बाबतीत त्याच्या खरेपणाची जाणीव कां होत नाही ? आपण स्थळ, काळ आणि निमित्त किंवा कार्यकारणभाव ह्या तीन बंधनात वावरतो. नाम हे त्याच्या पलीकडे आहे. नाम घेताना काळाचा विसर पडणे ही पहिली पायरी. नामाला बसला की की बसला कितीवेळ नाम चाललं आहे याचं भानच राहणार नाही. दुसरी पायरी स्थळाचा विसर पडणे.
या दोन्हीही पायऱ्या साधणे एकवेळ शक्य आहे पण तिसरा कार्यकारणभाव नाहीसा होणे कठीण आहे. मी नाम घेतो, त्यातून अमुक व्हावे , समाधान मिळावे , ज्ञान व्हावे असे काहीतरी राहतेच. नाम घेण्याला काही कारण नाही असे होत नाही. विचार केला तर माझ्या "असण्याला" काही कारण नाही.
मी आहे म्हणजे आहे. त्याला दुसरे कारण नाही . माझे असणे सिद्ध करायला दुसऱ्या कशाची जरुरी नाही. मी का जगतो प्रश्न निराळा.त्याचे काहीतरी उत्तर मिळेल. पण मी का आहे याला उत्तर नाही. तसे नाम केवळ आहे. माझे असणेपण जसे मला जाणवते तसे नामाचे असणेपण जाणवणे , म्हणजेच नामाचे नसणेपण कधीही नसणे ही नामाची वास्तव्यता , सत्यता आहे.
मी जसा जिवंत आहे तसं नाम जिवंत आहे . ते सत आहे तसेच ते चितही आहे . हा नामाचा वेगळा चैतन्यमय पैलू आहे . नाम सत आणि चित आणि तसेच ते आनंदमय ही आहे. आनंदाशिवाय त्यात काही नाहीच.
No comments:
Post a Comment