एक राजा आहे. त्याचे राज्य आहे. राजा सुखाने निजला असतानासुद्धा प्रजा आपापली कामं करतेच ना , तसं हा परमात्मास्वरूप असलेला आत्मा हा आतमध्ये निजलेला आसला तरी त्याची प्रजा काम करीत असते.
श्री.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की राजाने शहर बांधले तर त्याचे हात क्षीणले का ? राजा काय विटा उचलत होता ? तसा हा परमात्मा सर्व कर्ता असूनसुद्धा त्याचे कर्तेपण आपण समजतो तसं नाही. *"असणं"*
हेच त्यांचे कर्तेपण आहे. श्रीमहाराजांनी याला फार सुंदर दृष्टांत दिला आहे. एका माणसाला तीन मूल होती. भारी खोडकर होती. त्यामुळे वडील घरी नसले की मारामाऱ्या, गडबड , गोंधळ चालत असे. वडील थोडे स्वभावाने कडक होते. अशीच त्यांची गडबड चालू होती. संध्याकाळी वडील घरी आले. जिन्यावर त्यांची पावलं वाजली. मुलांचा गोंधळ एकदम थांबला . त्याला कल्पनाही नाही की मुलं गोधळ करीत होती.
तर श्रीमहाराज म्हणाले त्याने मुलांचा गोंधळ बंद करण्यात काय काम केलं ? त्याच्या नुसत्या अस्तित्वानेच काम केलं ना , तसं म्हणाले परमात्मा कोणालाही काही सांगत नाही काही म्हणत नाही . तो नुसता प्रकट झाला की जग चालतं. परमात्मा कसा आहे तर म्हणाले तो सत्तारूपाने आहे. आपल्याला जाणीव नसली तरी कार्य होईल. पण त्याचे अस्तित्व आहेच. ही जाणीव ठेवणे हा परमार्थ आहे.
No comments:
Post a Comment