ब्रम्हज्ञानी याज्ञवलक्य सधन गृहस्थाश्रमी होता. त्याला दोन बायका होत्या. एकीचे नाव मैत्रेयी व दुसरीचे नाव कात्यायनी. एके दिवशी याज्ञवल्क्याने मैत्रेयीला हांक मारली व तो तिला म्हणाला "मैत्रेयी मी आता संन्यास घेणार आहे . म्हणून तू आणि कात्यायनी दोघींमध्ये माझ्या संपत्तीची वाटणी करून देतो." कात्यायनी संसारी वृत्तीची साधी बायको होती.
मैत्रेयी अध्यात्म वृत्तीची बायको होती. तिला पतीच्या संपत्तीची वांटणी हवी होती. परंतु नश्वर संपत्तीची नको होती. तर तिला खरे समाधान देणाऱ्या ब्रह्मविद्येची संपत्ती पाहिजे होती. ती पवित्र संपत्ती याज्ञवलक्यांपाशी आहे हे तिला माहीत होते. तिने पतीला विचारले "हे भगवान पृथ्वीच्या मोलाइतके द्रव्य जर मला मिळाले तर मी मुक्त होईन का ?" त्यांनी उत्तर दिलें " मैत्रेयी तू म्हणतेस ते खरे आहे . द्रव्याने अमृतत्व मिळत नाही." यावर ती म्हणाली " द्रव्याने अमृतत्व मिळत नाही तर ते घेऊन मी काय करू.? अमृतत्व कसे मिळेल ते सांगा " याज्ञवल्क्य प्रसन्न होऊन म्हणाले " मैत्रेयी तू अत्यंत प्रिय भाषण करीत आहेस. ये बैस. ते ज्ञान तुला मी सांगतो . अखेर आपला आत्मा हाच समाधानाचे व प्रेमाचे मूलस्थान आहे. त्या आत्म्यालाच पाहण्याचा प्रयत्न करावा.
त्याचे चिंतन करावे , त्याचे ज्ञान झाले की सर्व जगाचे ज्ञान होते." असे याज्ञवलक्य म्हणाले. पैसा मोठा धोका देतो.व्यवहाराला तो अवश्य लागतो. पण त्याचा आधार वाटतो. त्यामुळे त्याचे प्रेम ईश्वरदर्शनाच्या आड येते. पैशाचे प्रेम नसणे ही खरी संतांची दृश्यातील खूण आहे.
No comments:
Post a Comment