श्रीराम,
अनेकदा नामात मन एकाग्र होत नाही. मानसपूजेने मन एकाग्र व्हायला मदत होते. कारण कल्पनेने आपण फक्त एका भगवंताचा विचार करत असतो. हळूहळू त्या विचाराने आपण आपल्या आराध्य दैवताच्या प्रेमात गुंतुन जातो.. त्यामुळे अवांतर विषय कमी होतात.
त्याने रजोगुण कमी होतो आणि सत्वगुण वाढीला लागतो. मन शांत आणि प्रसन्न होऊ लागते. माझा देव माझ्या बरोबर आहे या विचारांनी मनातील सुप्त भय कमी होते आणि हळूहळू निर्भयता प्राप्त होऊ लागते.
सर्व कर्ता करविता तो आहे, असा अनुभव यायला लागला की आपसूकच कर्तृत्व भोक्तृत्व कमी होऊ लागते.
सृष्टीच्या सार्वभौम राजाबरोबर जवळीक आहे असे मानसपूजेने जाणवायला लागले की आपोआप सुख समाधान वाढीला लागते. मानसपूजेने संवेदनशीलता वाढते. मानसपूजा हे अनुसंधानाचे उत्तम साधन आहे, कारण डोळे मिटून एकावरच लक्ष केंद्रित केल्याने बहिर्मुख जगातील नामरुपे नाहीशी होतात.
सुरवातीला भगवंत माझ्या आत आहे आणि मी त्याची पूजा करत आहे असा विचार करताना, एक दिवस मी आणि भगवंत एकच आहे, इथपर्यंत पोहचणे. म्हणजेच मी म्हणजे देह नसून मी भगवंत आहे.. या पायरीपर्यंत येणे आणि नंतर मी ब्रह्म आहे.. अहं ब्रह्मास्मि चा अनुभव घेणे म्हणजे आत्मनिवेदन भक्ती होय.
साधनचतुष्टय संपन्न अधिकारी शिष्य मानसपूजेने, ध्यानाने आत्मनिवेदन साधू शकतो.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment