TechRepublic Blogs

Monday, February 5, 2024

स्मरण

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*



*कर्तव्यात  परमात्म्याचे  स्मरण ।*


आपले कर्तव्याला न विसरावे । भगवंताचे अनुसंधान राखावे ॥


व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे । बाकी रामावर सोपवावे ॥


कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण । यातच सिद्धीचे बीज जाण ॥


असा करावा संसार । जेणे राम न होईल दूर ॥


देहाने कर्तव्याची जागृति । त्यात ठेवावी भगवंताची स्मृति । कर्तव्यात असते मनाची शांति ॥


कर्तव्याचा कधी न पडावा विसर । हृदयी धरावा रघुवीर ॥


ऐसे वागेल जो जनी । त्याने जोडला चक्रपाणि ॥


उद्योगाशिवाय राहू नये । कर्तव्याला चुकू नये । पण त्यात रामाला विसरू नये ॥


ठेवावा रामावर विश्वास । कर्तव्याची जागृति ठेवून खास ॥


देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान । हेच भक्तीचे लक्षण ॥


देह करावा रामार्पण । स्वतःचे कर्तेपण सोडून ॥


शास्त्री पंडित विद्वान झाला । भगवत्पदी न रंगला । व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे ॥


भगवंतापाशी राहावे रात्रंदिन । हाच सुखाचा उत्तम उपाय जाण ॥


रामाचे चरणी घ्यावी गति । हाच विचार आणावा चित्ती ॥


सुटावी प्रपंचाची आस । तेथे परमात्म्याचे प्रेम खास ॥


सर्व कर्मांत अधिष्ठान असावे देवाचे । तोच कल्याण करील साचे ॥


भले बुरे जे असेल काही । ते सोडावे रामापायी ॥


चित्त असावे रामापायी । देहाने खुशाल संसारात राही ॥


आपण व्हावे रामार्पण । सुखदुःखास न उरावे जाण ॥


धन्य त्याची जननी । ज्याने राम आणिला ध्यानी मनी ॥


रामाविण दुजे काही । आता सत्य उरले नाही ॥


भाव ठेवावा चित्तात । सुखे आयुष्य घालवावे त्याचे सान्निध्यात ॥


ज्याने जिणे केले रामार्पण । त्यासी व्यवहार हेच खरे योगसाधन ॥ 


'माझे सर्व ते रामाचे' । मानून जगात वागणे साचे ।


अशास नाही कष्ट फार । मागे पुढे रघुवीर ॥


आपण व्हावे मनाने रामाचे । राम जे करील तेच घडेल साचे ॥


चित्त ठेवावे रामापायी । दुजे मनात न आणावे काही ॥


आता न सोडावी हरीची कास । होऊन जावे त्याचे दास ॥


दास्यत्वाचे मुख्य लक्षण । मालकावाचून न दुसऱ्याची आठवण ॥


भगवंताचा दास झाला । जग मानत त्याला ॥


म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास । हे उरी बाळगावे खास ॥


'एकच जगती माझा रघुपति' । याहून दुजा न करावा विचार । हाच ठेवावा निर्धार ॥


भाव ठेवता रामापायी । तो कधी कमी पडू देणार नाही ॥


मनाने जावे भगवंताला शरण । जो चुकवील दुःखाचे कारण ॥


राम माझी मातापिता । बंधु सोयरा सखा ।


तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी । याहून दुजा विचार मनात न आणी ॥


*५१ .   आता  सांभाळावे  सर्वांनी  आपण ।  रामाविण  जाऊ  न  द्यावा  क्षण ॥*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

No comments:

Post a Comment